अरुंधती
सकाळ च्या पहिल्या किरणांसोबत जशी आतूरलेली पाखरं बिलगून पुन्हा नव्या उमेदीने आकाशी झेप घ्यायची अगदी तसचं व्हायचं माझं जेव्हा समोरच्या गॅलरीत ती फुलांना पाणी घालायची. माझी रोजची सकाळ तिच्या तेजस्वी चेह-याच्या किरणांनी व्हायची. तिला पाहिलं कि फूलहि नव्या तेजीनं खुलायची. पाखरं ही तिच्या भेटीस येत तेव्हा जेव्हा ती अर्धवट भिजलेल्या अंगाने, ओल्या केसांना टॉवेल गुंडाळून गॅलरीत फुलांना पाणी घालायची.
अगदी साधा साज असायचा तिचा, न्हाऊन आल्यावर तिचा तेज अजून फुलायचा, नक्षत्र नजर, एक छोटीशी अलगूज उमलावी अशी ओठांची गुलाबी पाकळी, त्या ओठांच्या भेटीस तरसलेला तो ओठांच्या कोप-यावरचा तिळ , नितळ पिळदार, शुभ्र मखमली कंबरेचा बांधा, वलदार शरीरावर एकही डाग नाही. अस तारूण्य पाहून कोणीही त्या अप्सरेच्या प्रेमात पडेल .तिला पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नसे काही तरी चुकल्यासारख वाटत असे, दोन वर्षे झाली मला या घरात येवून पण या दोन वर्षांत कधी हिम्मत झाली नाही तिला बोलायची. सुरवातीला लपून छपून पहायचो तिला. नवरा मिल्ट्रीत असतो., येतो आधी मधी तिला भेटायला, सासू-सासरे आहेत, मुलगा मिल्ट्रीत असला तरी म्हातारपणी त्याच्या आधाराची सोय म्हणून ही अप्सरा आणली., नवीन लग्न झालं तेव्हा घर गजबजून जायचं त्यांचं , दिवसभर हसून खेळून रहायची पोर, पण आता दिड वर्ष झाली संजय काही आला नाही भेटायला, सरकारी नोकरी आहे आला तरी दोन दिवसासाठीच येतो, बिचारी रोज फोन ची वाट बघत असते, सासू-सासरे दोघेही तिला मुलीच्या वर प्रेम देतात, संजय रिटायरमेंट घेणार काही वर्षांनी अस ऐकलं होतं पण काय झालं नंतर कोण जाणे....एवढी माहिती आमच्या मालकीण बाईंनी दिली होती , मी बॅंकेत सर्वीस असतो हे त्यांना माहीत पडल्यावर! त्यानी माझ्या साठी खूप स्थळं सुचवली पण मला एकही नाही पटली, मग कोण जाने का अचानक त्यांनी ' अरुंधती ' चा विषय माझ्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. पण ति विवाहित होती म्हणून त्यांनी फक्त माहिती दिली. मीही ती फक्त माहिती म्हणूनच घेतली कारण तीच माझी मर्यादा होती.
दिवाळी सुट्टीमुळे मी जरा गावी जाऊन आलो, मन लागेना म्हणून सहा दिवसांची सुट्टी चार दिवसात संपवून आलो, रात्री उशिरा आलो तर कॉलनी जरा नेहमी पेक्षा शांत दिसली, दिवाळीला सगळे गावी गेले असनार म्हणून कदाचित! आतूरत्या सकाळ ची वाट पाहत मी निजलो, नेहमीप्रमाणे सकाळी अरुंधती ची वाट पाहत गॅलरीत उभा होतो, पण आज मी उशिरा उठलो कि सुर्य लवकर उगवला काही कळेना., तिच्या दारावरही लॉक दिसलं तेही एवढ्या वर्षात कधी नव्हत ते!जीव कासावीस झाला मग राहवलं नाही म्हणून तोंड धुवून चहाच्या बहाने खाली घरमालकीण कडे गेलो . त्यांनी ही काही न विचारता चहा दिला आणि मी विचारायच्या आधी त्याच म्हणाल्या ' तिचा नवरा देशासाठी शहीद झाला परवा ! बॉर्डरवर जंग छेडली म्हणे परवा बरेच जवान शहीद झाले, त्यात संजय ही छातीवर गोळी घेवून शहीद झाला, अरुंधती आणि तिचे सासु-सासरे गेलेत बॉर्डरवर ! तिकडून ते सगळे परदेशी जाणार त्यांच्या मोठ्या मुलाकडे, आता तुही तिला विसरून जा...
तुझी दिवसांची सुरवात करणारी अरुंधती नावाची किरण आता तुझ्या आयुष्यात राहीली नाही!!
#रिंकी.....
Comments